दिल्लीत होणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करावी ; पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ

नवी दिल्ली | दि.30 | २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीत होणार्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्याचे खासदार व केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो साहित्यिक सहभागी होणार असल्याने यानिमित्ताने साहित्यिकांच्या प्रवासाच्या सोयीसाठी पुणे ते नवी दिल्ली दरम्यान १९ फेब्रुवारी २०२५ रोजी आणि नवी दिल्ली ते पुणे दरम्यान २४ फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केली.
मुरलीधर मोहोळ यांच्या विनंतीचा विचार करून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष गाडीची तरतूद करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे प्रशासनाला दिल्या.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सकारात्मक पाऊलाबद्दल समस्त साहित्यिकांच्या आणि मराठीजनांच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे आभार मानले. मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा आणि देशाच्या राजधानीत होत असलेलं हे संमेलन निश्चितच प्रत्येक मराठी माणसाला आनंद देणारे असणार आहे अश्या भावना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या.